ऑक्टोबरमध्ये सुरु होणा-या दारिद्र्यरेषेच्या सर्वेक्षणात
‘गरिबीचे न्याय्य मापन झालेच पाहिजे’
या मागणीसाठी
एक दिवसीय धरणे
20 सप्टेंबर 2011, दु. 12 ते सायं. 5, आझाद मैदान, मुंबई
जातीच्या जनगणनेबरोबरच दारिद्र्यरेषेच्या सर्वेक्षणाला जूनपासून देशभर सुरुवात झाली असून येत्या 2 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागात ते सुरु होत आहे. डिसेंबरअखेरीस ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. याआधीच्या 1997 तसेच 2002 च्या सर्वेक्षणांचा अनुभव चांगला नव्हता. असंख्य पात्र गरीब त्यातून वगळले गेले होते. चुकीचे वा अपुरे निकष तसेच सर्वेक्षणातील त्रुटी यामुळे असे घडले.
यावेळच्या सर्वेक्षणात असे होऊ नये यासाठी राष्ट्रीय अन्न अधिकार अभियान केंद्र सरकारशी पाठपुरावा करत असून महाराष्ट्र सरकारकडे राज्य अन्न अधिकार अभियान पाठपुरावा करत आहे. या पाठपुराव्या दरम्यान, या अत्यंत महत्वाच्या सर्वेक्षणासाठी सरकार सिद्ध असल्याचे दिसले नाही. जेमतेम 12 दिवसांत प्रगणकांचे प्रशिक्षण तसेच अन्य यंत्रणा राज्य सरकार कशी उभारणार आहे, हे कळत नाही. यावेळी देशात प्रथमच शहरांचेही सर्वेक्षण होणार असल्याने त्यासाठीची तयारी तर अधिकच करणे गरजेचे आहे. तथापि, हे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असणा-या महानगरपालिका, नगरपालिकांना अजून याची पुरेशी खबरबातच नाही. शहरी भागासाठी गरीब ठरविण्याचे निकष अजून निश्चित झालेले नाहीत.
प्रस्तावित अन्न सुरक्षा कायदा, राजीव आवास योजना इ. अनेक योजनांसाठी या सर्वेक्षणातून तयार होणारी गरिबांची यादी पुढील 5 वर्षांसाठी आधार मानली जाणार आहे. यादृष्टीने हे सर्वेक्षण निर्दोष व न्याय्य होणे गरजेचे आहे. तथापि, सरकारची वरील अवस्था पाहता, पुन्हा जुन्या सर्वेक्षणांतील उणिवांची पुनरावृत्ती होण्याचीच शक्यता दिसते.
अशावेळी जागृत नागरिक म्हणून आपण सरकारला याचा जाब विचारला पाहिजे व सर्वेक्षणासाठीची आवश्यक ती सिद्धता युद्धपातळीवर करुन गरिबीचे न्याय्य मापन करायला भाग पाडले पाहिजे.
या हेतूने अन्न अधिकार अभियानाशी संबंधित राज्यातल्या संघटनांनी 20 सप्टेंबर 2011 रोजी दु. 12 ते सायं. 5 या वेळात आझाद मैदान, मुंबई येथे एक दिवसीय धरणे आयोजित केले आहे. यावेळी सरकारला सर्वेक्षणाच्या गांभीर्याबाबतचा इशारा देत असतानाच संभाव्य त्रुटी दूर करुन गरिबीचे न्याय्य मापन होण्यासाठीच्या सूचनाही करण्यात येणार आहेत.
प्रश्नाचे महत्व व तातडी लक्षात घेता, आपण या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना, संघटनांना हे पत्रक पाठवून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करावे, ही विनंती.
या विषयीची अधिक माहिती, अन्य संदर्भ साहित्य, अहवाल, मागणीपत्र यासाठी खाली संपर्क करावा.
- संयोजन समिती, अन्न अधिकार अभियान, महाराष्ट्र
संपर्कः मुक्ता श्रीवास्तव, 604, सप्तगिरी, कॉस्मॉस हिल्स, उपवन तलावासमोर, पोखरण, मार्ग क्र. 1, ठाणे (प) – 400606र्इमेलः muktaliberated@gmail.com फोनः 9969530060